Saturday, May 2, 2026

बारावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?, मुलींचे वर्चस्व कायम

बारावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?, मुलींचे वर्चस्व कायम

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात नाशिक विभागाने ९०.७२ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विभागाच्या निकालात ०.५९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

नाशिक विभाग चौथ्या क्रमांकावर

शनिवार (दि. २) रोजी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागातून एकूण १,६२,९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६१,८१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १,४६,७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९३.४२ टक्के तर मुलांचे ८८.४० टक्के इतके आहे.

एकूण २४,१७५ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ५३,६१३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १२,१९० विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १८,४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७,२२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहराचा एकूण निकाल ९३.४० टक्के आहे. येथेही मुलींनी (९५.३१ टक्के) मुलांपेक्षा (९१.५७ टक्के) सरस कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment