मुंबई : सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे, महाबळेश्वर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. खंडाळा, लोणावळा आणि बोरघाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन ते तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने आणि अनेक गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या भीषण परिस्थितीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले एकनाथ शिंदे हेलिपॅडवर उतरताच या कोंडीची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट पोलिसांना फोन लावला आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. प्रवाशांचा मनस्ताप कमी करण्यासाठी टोलनाक्यांवर कोणत्याही प्रकारचा टोल न आकारता वाहने त्वरित सोडून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
संपूर्ण रस्ता जाम आहे; त्वरित टोलनाके मोकळे करा...उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश
मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हेलिकॉप्टरने पोहोचले. या प्रवासादरम्यान आकाशातूनच त्यांना एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि भयंकर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हेलिपॅडवर पाऊल ठेवताच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. "आम्ही हेलिकॉप्टरमधून पाहिलं आहे, संपूर्ण रस्ता पूर्णपणे जाम आहे. त्यामुळे प्रवाशांचा आणखी खोळंबा होऊ नये यासाठी तात्काळ टोलनाके मोकळे करा. सध्या गाड्यांकडून कोणतेही पैसे घेऊ नका आणि त्यांना पुढे सोडून द्या, याबाबत पोलिसांना त्वरित सूचना द्या," असे स्पष्ट आणि धडक आदेश एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिसिंग लिंक‘चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची आता कायमची सुटका झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खोपोली एक्झिटजवळील पूल क्रमांक १ येथे बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करून १३.५ किलोमीटर लांबीचा हा भव्य प्रकल्प उभारला आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार असलेल्या या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोणावळा तलावाच्या चक्क १८० मीटर खालून जाणारा बोगदा! २३.५ मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा ठरला असून, त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंद झाली आहे. आजपासून हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्याने मुंबई-पुणे प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.






