मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका क्रूझचा भीषण अपघात झाला आहे. पर्यटकांना घेऊन जाणारं एक क्रूझ नर्मदा नदीच्या खाडीत अचानक बुडालं. या दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत झाला आहे. बरगी धरणामध्ये झालेला हा क्रूझ अपघात केवळ एक दुर्घटना नसून, काळीज पिळवटून टाकणारा अपघात ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदा नदीच्या बॅकवॉटरमध्ये आलेल्या वेगवान लाटांमुळे पर्यटकांनी भरलेली ही क्रूझ (Jabalpur Cruise Accident) पाण्यात उलटली. या दुर्घटनेतून 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अद्याप 10 जण बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. जेव्हा क्रूझ नदीच्या खोल खाडीत पोहोचलं, तेव्हा हवामान अचानक बिघडलं आणि जोरदार वारे वाहू लागले होते. उंच लाटा आणि जोरदार वाऱ्यांमुळे क्रूझचा तोल गेला आणि काही क्षणांतच ते पाण्यात बुडू लागलं. यानंतर लगेचच स्थानिक खलाशी आणि प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला सुरुवात केली.
वाचवण्यात आलेल्या एका मुलीशी पत्रकारांनी संवाद साधला. बचाव पथकाच्या व्हॅनमध्ये घाबरून बसलेली ती मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, “क्रूझ अचानक पलटली आणि संपूर्ण जहाजात पाणी भरलं. सगळेजण सैरावैरा पळू लागले होते. त्यात मला माझे वडील कसेतरी सापडले, म्हणून मी त्यांचा हात धरला. माझी आई आणि भाऊ बेपत्ता आहेत. माझे आजोबाही सापडले, पण माझ्या आजीचं निधन झालं. तिचा मृतदेह सापडला आहे.” (Jabalpur Cruise)
माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा
अपघाताच्या काही क्षणांपूर्वी आपल्या आई-वडिलांसोबत आणि भावासोबत खळखळून हसणाऱ्या त्या मुलीच्या डोळ्यांत आता केवळ वेदनाच शिल्लक राहिल्या आहेत. एका क्षणात तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज सकाळी त्या मुलीच्या आईचा मृतदेह सापडला असून, तिने तिच्या मुलाला छातीशी कवटाळलं होतं. डायव्हिंग टीमने बचाव कार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू केले, तेव्हा पाण्याच्या खोलीत असे दृश्य दिसले जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. खोल पाण्यात बुडालेल्या क्रूझच्या ढिगाऱ्यात एका मातेचा मृतदेह सापडला, जिने आपल्या निष्पाप बाळाला छातीशी इतक्या घट्टपणे कवटाळले होते की मृत्यूलाही त्यांची पकड सैल करता आली नाही.शेवटच्या क्षणापर्यंत ती आई मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.
प्रशासनाकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
प्राथमिक तपासात असं समोर आलं की अपघाताच्या वेळी नर्मदा नदीच्या खाडीतील हवामान अचानक बिघडलं होतं. जोरदार वारे वाहू लागल्याने उंच लाटा निर्माण झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ आधीच हेलकावे खात होतं, परंतु कर्मचाऱ्यांना त्याला तात्काळ किनाऱ्यावर आणलं नाही, ज्यामुळे हा अपघात घडला. या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






