ऋतुराज : ऋतुजा केळकर
प्रपंच हे वन,
मोहाचे काटे दाटती ।
ध्यान दीप उजळे,
अंधारे सारे हटती ॥
गुरुनाम फुले,
सुवास निर्मळ देती ।
जीव शिवरूपात,
आनंदी होई निती ॥
प्राजक्ताची फुले टपटप अवेळी पडलेल्या वळवाच्या पावसाने भिजलेल्या अंगणात पडावी तसे काहीसे मला झाले, जेव्हा माझ्या लेखणीतून हे मृद्गंधी शब्द झरले. ज्याचा अर्थ असा आहे की, प्रपंच हे असे वन आहे की जिथे मोहाचे काटे दाटून आलेले असतात आणि त्यातून मार्ग काढावा लागतो. ध्यानाचा दीप उजळला की अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आणि मनाला खरी दिशा मिळते. गुरुनामाची फुलं उमलली की त्यांचा सुवास मनाला शुद्ध करतो आणि जीवन निर्मळ होतं. शेवटी जीव शिवस्वरूपात लीन होतो आणि साधनेतून अखंड आनंद प्राप्त होतो. सुरुवातीला तो हिरवाईसारखा मोहक वाटतो. नव्या नात्यांची नाजूक वेल, लग्नानंतरचे गोड क्षण, मुला–बाळांचं खोडसाळ लडिवाळ वागणं हे सारं जणू पक्ष्यांच्या किलबिलाटासारखं मनाला भुरळ घालतं. त्या क्षणांत जीवन जणू वसंताच्या झुळुकीत न्हाल्यासारखं हलकं होतं.
हिरवाईच्या त्या सुरुवातीच्या दिवसांत प्रत्येक क्षण जणू फुलांच्या सुवासासारखा वाटतो. नव्या नात्यांची गोडी म्हणजे वसंताच्या झाडावर उमललेली पहिली कळी. मुलांच्या खोडसाळपणात जसा आनंद असतो, तसा संसाराच्या सुरुवातीच्या खेळातही मोहकता असते. त्या वेळेस जबाबदाऱ्यांचा भार अजून जाणवत नाही, नियतीचे सावट अजून दाटलेले नसते. जणू जीवनभूमीच्या कडेला उभं राहून आपण फक्त हिरवाईच पाहतो, काट्यांचा गुंता अजून नजरेत भरत नाही.
पण जसजसे दिवस पुढे जातात, तसतसे काटेरी झुडपे दाटू लागतात. काट्यांची ती दाटी म्हणजेच जीवनातील अनिवार्य जबाबदाऱ्या. ही काटेरी झुडपे म्हणजे जबाबदाऱ्यांचे ओझे, नियतीचे सावट आणि कधी काळामुळे तर कधी सोबतच्यांनी सोडलेली साथ. सुरुवातीला ज्या नात्यांची गोडी मनाला सुखावते, तीच नाती पुढे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने जड होतात. नियतीचे सावट कधी काळाच्या बदलामुळे तर कधी सोबतच्यांनी सोडलेल्या साथीतून दाटते. हिरवाईची मोहकता हळूहळू काट्यांच्या गुंत्यात हरवते. प्रपंच मग फक्त आनंदाचा उत्सव न राहता, संघर्षाचा प्रवास ठरतो. जीवनाच्या प्रवासात काटे असले तरी त्यांच्यातून उमलणारी फुलं मनाला आश्वस्त करतात.
पण काट्यांसारखे हे अनुभव मनाला टोचतात. सुरुवातीची लडिवाळता हळूहळू गंभीरतेत रूपांतरित होते. जबाबदाऱ्यांचे ओझे जणू खांद्यावरचा दगड, नियतीचे सावट जणू दाटलेले ढग आणि सोबतच्यांनी सोडलेली साथ जणू पायाखालची जमीन सरकावी तशी वाटते. हिरवाईची मोहकता मग फक्त आठवणीत राहते. प्रपंचाचा प्रवास मोहकतेतून संघर्षाकडे सरकतो. काट्यांची ती दाटी म्हणजेच जीवनातील अनिवार्य जबाबदाऱ्या. सुरुवातीला ज्या नात्यांची गोडी मनाला सुखावते, तीच नाती पुढे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने जड होतात. नियतीचे सावट कधी काळाच्या बदलामुळे तर कधी सोबतच्यांनी सोडलेल्या साथीतून दाटते. हिरवाईची मोहकता हळूहळू काट्यांच्या गुंत्यात हरवते.
तरीही हा प्रवास केवळ अंधाराचा किंवा काट्यांचा भास असावा असं नाही. काट्यांच्या दाटीतही एखादं फूल उमलतं, सावटाच्या गडद छायेतही एखादा दीप उजळतो. जीवनाच्या वनात काटे असले तरी त्यांच्यातून उमलणारी फुलं मनाला आश्वस्त करतात. ध्यान दीप उजळला की अंधार वितळतो आणि गुरुनामाची फुलं उमलली की मोहाचा दाह शांत होतो. जशी प्राजक्ताची फुलं अवेळी पडलेल्या पावसाने भिजून अंगणात सुवास पसरवतात, तशीच गुरुनामाची फुलं मनाच्या वनात उमलतात. त्या फुलांचा सुवास मनाला निर्मळ करतो, जबाबदाऱ्यांच्या काट्यांतूनही शांततेचा तसेच जबाबदारीचा अखंड झरा बनून मनात वाहत राहतो.
प्रपंच हा प्रवास आहे आणि त्या प्रवासातले प्रत्येक अनुभव वेगळा रंग घेऊन येतात. सुरुवातीची हिरवाई जशी प्रेमाच्या नाजूक क्षणांची आठवण करून देते, तशीच पुढे काटेरी झुडपे जबाबदाऱ्यांचे ओझे दाखवतात. पण हा प्रवास इतक्यावर थांबत नाही. त्यात सावटं आहेत, झुळुकी आहेत आणि सुख समृद्धी आणि मनशांती यांची फुलपाखरंही आहेत. या हिरवाईतील वाघ म्हणजे ‘अहंकार’ तो गर्जना करतो, भय निर्माण करतो, पण त्याच्याशी सामना केला की मनाला धैर्य मिळतं. साप म्हणजे ‘मोह’ तो सरपटतो, विकारांचा फणा काढतो , पण त्याला ओळखलं की त्याचं विष आपोआपच उतरत. फुलपाखरं म्हणजे आनंद ती क्षणिक असतात, पण त्यांचा रंग मनाला या साऱ्या भारांना हलकं करतो. अशा या वनात प्रत्येक घटक जीवनाचा धडा शिकवतो.
प्रपंच असा आहे की त्यात काटे आहेत, पण फुलंही आहेत, अंधार आहे, पण दीपही आहे, प्राणी आहेत, पण पक्ष्यांची किलबिलही आहे. प्रपंचातही काही क्षण शांततेचे असतात. मुलं–बाळं खोडसाळपणे खेळतात, लडिवाळपणे हसतात, ते क्षण जणू पक्ष्यांच्या गाण्यासारखे असतात. जबाबदाऱ्यांचे ओझे जरी खांद्यावर असले तरी त्या हसण्यातून मिळणारा आनंद मनाला हलकं करतो. नियतीचे सावट जरी दाटलेले असले तरी श्रद्धेचा दीप उजळला की अंधार वितळतो. गुरुनामाची फुलं उमलली की मोहाचा दाह शांत होतो. प्रपंच असा असावा की प्रत्येक काटा धैर्य शिकवावा, प्रत्येक सावट श्रद्धा वाढवावं, प्रत्येक मोह संयम शिकवावा आणि प्रत्येक फुल सुवास पसरवावं. तेव्हाच प्रपंच हे भयावह न राहता आनंदमय साधना बनेल. जीवन म्हणजे वनातील प्रवास. सुरुवातीला हिरवाई, नंतर काटेरी झुडपे, मग प्राणी, सावटं, झुळुकी आणि शेवटी फुलांचा सुवास. या प्रवासात जो ध्यान दीप उजळतो आणि गुरुनामाची फुलं उमलवतो, तोच या संसार सागरातून पार होतो.
प्रपंच हा प्रवाह आहे. सुरुवातीला तो झऱ्यासारखा निर्मळ, गोडसर आणि हलकासा वाटतो. नव्या नात्यांची गोडी, लग्नानंतरचे लडिवाळ क्षण, मुलं–बाळांचं खोडसाळ हसरं वागणं हे सारं त्या झऱ्याच्या पाण्यासारखं मनाला ताजंतवानं करतात. पण जसजसा प्रवाह पुढे जातो, तसतसे त्यात गाळ मिसळतो, दगड–खडक येतात, कधी पूर येतो तर कधी दुष्काळ. हे म्हणजेच जबाबदाऱ्यांचे ओझे, नियतीचे सावट आणि सोबतच्यांनी सोडलेली साथ.
नदी जशी खडकांना धडकते, वळणं घेत पुढे सरकते, तशीच प्रपंचाची वाटही असते. संघर्ष येतो, काटेरी अनुभव टोचतात, पण प्रवाह थांबत नाही. त्याला दिशा देणारा दीप म्हणजे ध्यान आणि त्याला सुवास देणारी फुलं म्हणजे गुरुनाम. जशी नदी शेवटी समुद्रात विलीन होते, तशीच प्रपंचाची वाट शेवटी शिवस्वरूपात लीन होते.
प्रपंच असा असावा की प्रवाहात गाळ असला तरी पाणी स्वच्छ राहावं, खडक असले तरी प्रवाह थांबून त्याचे नकोसे वाटणारे डबके होऊ नये, पूर आला तरी त्यातून नवा मार्ग तयार व्हावा. जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातूनही नात्यांची गोडी उमलावी, नियतीच्या सावटांतूनही श्रद्धेचा प्रकाश दिसावा आणि मोहाच्या गुंत्यातूनही गुरुनामाचा सुवास पसरावा.
शेवटी इतकेच सांगेन की , प्रपंच हा नेहमीच असेल तसा स्वीकारावा. त्याला हसतमुखाने सामोरी जावे कारण प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला आपापल्या आयुष्यात प्रपंचाचे चटके हे सोसायचेच असतात मग ते हसतमुखाने का नको बरे सोसायला. हिरवाई असो वा काटे, झरा असो वा खडक, सावट असो वा दीप, प्रत्येक अनुभव जीवनाला नवा अर्थ देतो. प्रपंच हा शत्रू नाही, तर साधनेचा प्रवाह आहे. जो ध्यान दीप उजळतो आणि गुरुनामाची फुलं उमलवतो, तोच या प्रवाहातून पार होऊन शिवस्वरूपात लीन होतो.