Thursday, April 30, 2026

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध दीर्घकालीन लढ्यासाठी पूर्णपणे तयार होता, असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले.ते नवी दिल्लीतील एका नॅशनल सिक्युरिटी समिट या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र म्हटले आणि दहशतवादाच्या मुळावर प्रहार करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की, सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाअंतर्गत दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पुढे त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू करण्यात आले होते आणि ते एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरले. यामुळे जगाला स्पष्ट संदेश गेला की भारत आता केवळ निवेदनांपुरता मर्यादित राहणार नाही.

त्यांनी सांगितले की भारतीय सैन्याने कारवाईदरम्यान फक्त त्या ठिकाणांवर लक्ष्य केले, जिथून दहशतवादी कारवाया चालवल्या जात होत्या. तसेच, ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय भारत कमकुवत झाल्यामुळे नव्हता, तर तो पूर्णपणे स्वेच्छेने आणि स्वतःच्या अटींवर घेतला गेला होता. त्यांनी नमूद केले की भारतीय सैन्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे आणि गरज पडल्यास ती वेगाने वाढवण्याची क्षमता देशाकडे आहे.

संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की भारताला अणुहल्ल्याची धमकी देण्यात आली होती, मात्र देशाने त्याला गांभीर्याने घेतले नाही आणि कोणत्याही दबावाखाली झुकला नाही. त्यांनी स्पष्ट केले की भारताचे लष्करी यंत्रणा शांततेच्या काळातच नव्हे, तर युद्धकाळातही वेगाने संसाधने उभारण्यास सक्षम आहे.

संरक्षण मंत्र्यांनी पुढे सांगितले की दहशतवाद हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नाही, तर त्याचे तीन पैलू आहेत—ऑपरेशनल, वैचारिक आणि राजकीय. या तिन्ही स्तरांवर कारवाई केल्याशिवाय दहशतवादाचा पूर्ण अंत होऊ शकत नाही.

पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की भारत माहिती तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो, तर पाकिस्तान ‘इंटरनॅशनल टेररिझम’साठी ओळखला जातो. दहशतवादाचा पूर्ण नायनाट करण्यासाठी त्याच्या वैचारिक आणि राजकीय मुळांवर प्रहार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले.या ऑपरेशनमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या 9 प्रमुख तळांचा नाश करण्यात आला आणि 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवस संघर्ष सुरू राहिला आणि अखेरीस 10 मे रोजी युद्धविरामावर सहमती झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >