तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर इतकं टोकाला पोहोचलं की पत्नीने कुटूंब उद्ध्वस्त करणारा निर्णय घेतला. नॉनव्हेज जेवणावरून सुरु झालेला वाद थेट पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
नेमकं प्रकरण काय ?
तेलंगणातील कामारेड्डी परिसरातील (Kamareddy) वाम्बे कॉलनीत कोदंडा शिवाजी नामक व्यक्ती राहत होता. कोदंडा शिवाजी दिहाडीवर काम करणारा मजूर होता. तो आपल्या पत्नी लक्ष्मी आणि दोन लहान मुलींसोबत येथील भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. रोजच्या मजुरीवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. त्याच्या मोठ्या मुलीचं वय दोन वर्षे तर लहान मुलीचं वय एक वर्ष इतकं आहे.
या जोडप्याचं जेवण बनवण्याच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री वाद झाला. माहितीनुसार, जेवणात चिकन न बनवल्याने शिवाजी नाराज झाला होता. त्यातच घरच्या आर्थिक अडचणींमुळे तो काहीसा नैराश्यात होता. या दोन्ही गोष्टींमुळे पती-पत्नीमधील वाद अधिकच चिघळला.हा किरकोळ सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर झाला. आरोपानुसार, संतापाच्या भरात लक्ष्मीने घरात असलेल्या धारदार हत्याराने शिवाजीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर गंभीर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ( Crime News )
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ( Telangana Crime News ) आरोपी पत्नी लक्ष्मीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामारेड्डी पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे एका रात्रीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास कर आहेत.