पुणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ पैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली तर तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले.दोन्ही राज्यांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात बारामती विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५६.२० टक्के मतदान झाले.
बारामतीत सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुरवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी रांगा दिसून आल्या. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात कडक उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपली तरी बारामतीच्या ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असून कोणताही मोठा अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी गुरुवारी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरी भागाच्या टक्केवारीत ग्रामीण भागातीलही टक्केवारी बरोबरीत तर काही ठिकाणी वाढल्याचे पहावयास मिळाले. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी काहिशी संथ जाणवत असली तरी मात्र ९ नंतर या टक्केवारीत बऱ्यापैकी आघाडी घेतल्याचे चित्र होते. उन्हाच्या तप्त काहिलीत मतदानाचा टक्का घसरला. मात्र तो, दिवस सरता-सरता सावरल्याचेही निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार दिसले. काही ठिकाणी नेहमीप्रमाणे ईव्हीएम मशीनच्या खोळंब्याने मतदानात खोडा घातला. तर किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.
सकाळी ७ ते ११ या वेळेत १८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी हक्क बजावला होता. नंतर उन्हामुळे मतदानाच्या वेगावर थोडा परिणाम झाला. पण दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. अखेर राहुरीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.३१ टक्के मतदान झाले. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे , उबाठाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.