Wednesday, April 22, 2026

Nitesh Rane PC : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

Nitesh Rane PC : महिला आरक्षण विधेयकामुळे विरोधकांचा खरा चेहरा समोर आला

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड केला असून, हिंदुत्वाचा विचार सोडून लाचारी पत्करणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा आमदारकीसाठी धडपडत आहेत, अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख थेट ‘उद्धव खान’ असा करत, राणे यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वर्तणुकीवर बोचरी टीका केली.

मंत्रालयात बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हिंदुत्व, महिला आरक्षण आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ यांसारख्या विषयांवरून विरोधकांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे हा अत्यंत लाचार माणूस आहे. ज्यांनी एकेकाळी विधान परिषदेचा राजीनामा देण्याची भाषा केली होती, तेच आता त्याच पदासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना ते चोरून फोन करत आहेत. उद्या हेच उद्धव ठाकरे सरपंच पदासाठीही उभे राहिले, तरी नवल वाटायला नको”, अशी बोचरी टीका राणे यांनी केली.

विरोधकांना पाकिस्तानातून ‘स्क्रिप्ट’

नितेश राणे म्हणाले, “ज्या खासदारांना 'फतव्यां'च्या जोरावर मते मिळाली आहेत, तेच या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसची संपूर्ण ‘स्क्रिप्ट’ पाकिस्तानातून येते,” असे ते म्हणाले. खासदार सुप्रिय सुळे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, सुळे यांची भूमिका ही नेहमीच ‘लव्ह जिहाद’च्या समर्थनाची राहिली असल्याची टीकाही केली.

‘भगवा कधीच दहशतवादी नसतो’

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “भगवा कधीच दहशतवाद करत नाही, हे आता न्यायालयानेही सिद्ध केले आहे. केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक पेरला होता. काँग्रेस आणि पाकिस्तानची विचारधारा एकच आहे, हेच यातून स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.

‘कॉर्पोरेट जिहाद’वर हल्लाबोल

नाशिक आणि पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये धार्मिक कारणांसाठी विश्रांती कक्षाचा गैरवापर होत असल्याचा मुद्द्यावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. “शाळांप्रमाणेच कॉर्पोरेट कार्यालयांतही हिजाब आणि बुरख्यावर बंदी घातली पाहिजे. जर लेन्सकार्ट सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कपाळाला टिळा लावण्यावर बंदी असू शकते, तर बुरख्याला परवानगी का? हा एक प्रकारचा ‘कॉर्पोरेट जिहाद’ असून याविरोधात हिंदुत्ववादी सरकार ठाम भूमिका घेणार आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >