Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज लक्ष्मी नारायणाचे दर्शन मिळेल आणि त्याद्वारे गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख समृद्धी लाभेल,भरभराट होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तळे जवळील बोरीचा माळ गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ त्यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शिंदे यांनी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, खरं तर गावात मंदिर आले म्हणजे एक मांगल्य आले पवित्र वातावरण आले. घरी पूजा केली तरी आपण मंदिरात अजून देवाचे दर्शन घेतो आणि या सुंदर मंदिरात देवाचे दर्शन घेण्याची संधी मिळवून दिली ती आमदार तुकाराम काते, ग्रामस्थ, देवजी काते यांचे मनापासून अभिनंदन करतो असे सांगितले. या मंदिरातील मूर्ती ३०० वर्षापूर्वी मुंबईहून पायी चालत या गावी आणण्यात आल्या. ज्यांनी त्या काळी हे करून दाखवले त्यांचेही आभार मानायला हवेत. त्याकाळच्या लोकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या आहेत. त्या तुलनेत आता सर्वच ठिकाणी विकास झालेला आपल्याला दिसत असल्याचे सांगितले.

रायगड हा जिल्हा निसर्ग संपदेने समृद्ध असा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या भूमीत घडलेला आहे. त्यामुळेच या मातीतला मावळा भरतशेठ आज मंत्री झाले आहेत. रायगड ही पुण्यभूमी आहे. या मातीत येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी शिंदेंनी नमूद केले. मंदिर बांधण्याचे एक वेगळे समाधान माणसाला असते. या मंदिराचे पावित्र्य जपणे, दररोज दिवा बत्ती करणे, पूजा अर्चा करणे, स्वच्छता टापटीपणा ठेवणे हे आपल्या गावकऱ्यांचे काम आहे. हे काम करण्यासाठी तळा नगर पंचायतीला मी १६ कोटी दिले होते, आता पुन्हा पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ६ कोटींची मागणी आली आहे. हा निधी देखील नक्की देईन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी ५६७ निर्णय घेतले. लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय त्यात महत्त्वाचा होता, अनेक जण ती योजना होऊ नये यासाठी कोर्टात गेले. मात्र तरीही ही योजना यशस्वी करून दाखवली. दीड हजारात काय होते असे विरोधक म्हणाले, पण माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, स्वतःचे पैसे स्वतः काढून घेण्याचा अधिकार मिळाला. कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही. काही महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाली नसल्याने पैसे येत नव्हते तेव्हा मी महिला आणि बालकल्याण विभागाला सांगून या ई-केवायसीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यास सांगितले. त्यामुळे पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत ही जबाबदारी आमची राहील असे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले. लेक लाडकी लखपती योजना केली, एका मुलीने शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचे समजल्यावर मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात ४७० कोटींची मदत देण्यात आली, महात्मा फुले योजनेत दीड लाखांची मदत वाढवून पाच लाख करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ग्रामीण भागातील ब वर्ग तीर्थक्षेत्र मंदिराना दिले जाणारे दोन कोटीचे अनुदान वाढवून मी पाच कोटी करण्याचा निर्णय घेतला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हे सरकार सर्वसामान्यांचे असून त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यायला हवेत यासाठी मी काम करत आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलोय, शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा प्रवास मी पूर्ण केला आहे. आई आणि पत्नीची काटकसर मी पहिली होती, त्यामुळेच माझ्या कारकिर्दीत महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

याठिकाणी हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे, इथे गोर गरीब येऊन दर्शन घेतील, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे नमूद केले. माझ्या आयुष्यात पैसे, प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा तमाम जनतेचे प्रेम किती कमावले ते जास्त महत्त्वाचे असते. सत्ता खुर्ची यापेक्षा राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख आज माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे असे सांगितले. मी मुद्दाम या छोट्या गावात आलो आहे, कारण तुकाराम काते हा आमच्या पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याने या छोट्याशा गावात एवढे भव्य मंदिर उभारले याचा मला सार्थ अभिमान आहे असे यावेळी नमूद केले. अतिशय सुंदर मंदिर उभे राहिले आहे आता फक्त गावकऱ्यांनी मिळून या मंदिराची योग्य निगा राखणे गरजेचे आहे, स्वच्छता,पावित्र्य, मांगल्य टिकवावे एवढीच अपेक्षा असल्याचे सांगितले. तळा नगरपंचायतीला या परिसराचा विकासासाठी निधी लागला तर तो नक्की उपलब्ध करून देऊ असे यावेळी सांगितले. या गावात अजून काही सुविधा निर्माण करायच्या असतील तर त्याही नक्की निर्माण केल्या जातील असेही यावेळी स्पष्ट केले. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार तुकाराम काते, अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर, जिल्हाधिकारी किसनकुमार जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, सुवर्णा करंजे, समृद्धी काते, अरुण चाळके, विपुल उभारे, राकेश वडके, रमेश मोरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Add Comment

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच