विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटील
शिवम आणि त्याच्या मित्रांचे सहलीला गेले असताना ज्ञान ग्रहण सुरू होते. “पण आपली पृथ्वी आजच्यासारखी कशी काय झाली मित्रा?” विपुलने प्रश्न केला. “ज्याप्रमाणे वाफ थंड झाल्यावर तिचे पाण्यात रूपांतर होते व तापमान आणखी कमी झाल्यावर पाण्यास घनरूप प्राप्त होते म्हणजेच बर्फ तयार होतो त्याप्रमाणे निर्मितीच्या वेळी पृथ्वी वायुरूप अवस्थेत होती. नंतर ती द्रवरूपात रूपांतरित झाली. कालांतराने ती थंड होतांंना तिच्यामध्ये बदल होत जाऊन तिला आजची घनावस्था प्राप्त झाली. द्रव अवस्थेतून घन अवस्थेत जाण्यासाठी तिला लाखो वर्षे लागलीत. या कालावधीमध्ये तिचा थंड होण्याच्या प्रक्रियेचा वेग हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होता. त्यामुळे ती गोठताना वेगवेगळ्या खडकांची निर्मिती झाली.” शिवमने सांगितले.
“पण पृथ्वीचे तर तीन भाग आहेत म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत?” अमोलने प्रश्न केला. “खडकांच्या कमी जास्त घनतेनुसार पृथ्वीचे तीन भाग बनलेत. कवच-१६ ते ४० कि.मी.पर्यंत पृथ्वीचे जाड कवच बनले. प्रावरण-हा देखील घनरूपातच २८९५ कि.मी आहे. गाभा-पृथ्वीच्या केंद्रापर्यंत ६३७० कि.मी. पृथ्वीचा गाभा आहे.” शिवमने उत्तर दिले. “मग आपली पृथ्वी आता कशी आहे गड्या?” कौशलने विचारले. शिवम् म्हणाला, “आपली लाडकी पृथ्वी ही गोठून आता पूर्णपणे घन झालेली आहे. अर्थात तिच्या गाभ्यात अजूनही खनिज पदार्थांचा व वितळलेल्या खडकांचा अतिउष्ण असा द्रवरस आहेच; परंतु वरून मात्र ती आता पूर्णपणे घनरूपी व कडक झाली आहे. ती खडक-दगडांसारख्या कठीण पदार्थांची बनलेली आहे व ध्रुवाजवळ थोडीशी चपटी झालेली आहे. आपल्या पृथ्वीवर खडक-माती, डोंगर-दया, पर्वत-पठारे, नद्या-नाले, सागर-सरोवरे, हिमपर्वत, ज्वालामुखीचे डोंगर, बर्फाळ ध्रुव, रेताड वाळवंटे आहेत. ती सूर्यापासून अंतरावर तिसया क्रमांकाचा व आकारमानाने पाचव्या नंबराचा गोलाकार ग्रह आहे. आपल्या पृथ्वीचा परिघ २५००० मैल आहे. पृथ्वीचे क्षेत्रफळ ५१ कोटी चौरस कि.मी. आहे. पृथ्वीमध्ये गॅस, कोळसा, पेट्रोल आदी कार्बनी पदार्थ तसेच विविध खनिजे मिळतात.”
“आपल्या पृथ्वीमध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत?” विपुलने प्रश्न केला. “तशी तर आपल्या पृथ्वीमध्ये १०० पेक्षाही जास्त मूलद्रव्ये आहेत; परंतु त्यांपैकी ऑक्सिजन (प्राणवायू), सिलिकॉन, अॅल्युमिनियम, आयर्न (लोह), कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर (गंधक) आणि निकेल ही महत्त्वाची मूलद्रव्ये आहेत.” शिवमने उत्तर दिले.
“ती गोलाकारच का झाली मित्रा?” अमोलने मध्येच शंका काढली. शिवम् म्हणाला, “सूर्यस्फोटाच्या वेळी ती अतिशय जोराने व वेगाने खूप दूरवर फेकली गेली. त्यामुळे तिला खूप गती मिळाली. त्याच गतीमुळे ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरत असते. अशी ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरून फिरून गोलाकार झाली आहे.”
“पृथ्वीच्या ध्रुवांना तू भौगोलिक ध्रुव का म्हटले?” कपिलने प्रश्न केला.
शिवम पुढे सांगू लागला, “कारण पृथ्वीच्या गोलाला भूगोल म्हणतात. त्या भूगोलाची दोन टोके म्हणजे भौगोलिक ध्रुव. या ध्रुवांवर सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असतो. उत्तर ध्रुवातून जाणारी पृथ्वीच्या अक्षाची रेषा सरळ आकाशात वाढवली, तर त्या रेषेच्या जवळपास असणारा तारा हा आकाशातील ध्रुव तारा असतो.”
“मग पृथ्वीचे आणखी दुसरे काही ध्रुव आहेत का?” विपुलने प्रश्न केला.
शिवम म्हणाला, “पृथ्वीच्या पोटात मध्यभागी लोखंड व निकेल असल्याने नि पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरत असल्याने ती स्वत: चुंबक झाली आणि तिचे स्वतःभोवती चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. तिचे चुंबकीय ध्रुव हे तिच्या भौगोलिक ध्रुवांपेक्षा वेगळे आहेत, पण ते त्या भौगोलिक ध्रुवांजवळच किंचितसे त्यांच्या बाजूला आहेत. या
चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राकडे वळतात.”