मुंबई : ‘मोदी है तो मुमकीन है या नमकीन है’ हे देशाच्या जनतेने ठरवले आहे. ही दंतकथा नव्हे तर सत्यकथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा निवडून आले. संजय राऊत, तुमच्या पक्षाची जंतकथा झालेली आहे. पोटातील जंताप्रमाणे तुम्ही वळवळत असल्याचे महाराष्ट्र पहात आहे. महिला आरक्षणविरोधी भूमिका घेत ते विधायक संसदेत पाडण्याचे काम उबाठा गटाने केले. याबद्दल लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत. रस्त्यावर उतरून त्या तुम्हाला धडा शिकवतीलच आणि येत्या निवडणुकांमध्येही मागच्या विधानसभेप्रमाणे तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय त्या राहणार नाहीत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.
महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष संजय राऊत आणि इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. या विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होत नव्हता तर उलट दक्षिणेतल्या खासदारांची संख्या वाढणार होती. परंतु तुम्हाला दक्षिणेतल्या राज्यांचे हित नको असल्याने त्या राज्यांची खासदारांची वाढणारी संख्या तुम्ही रोखली आणि या विधेयकाला विरोध करत देशविरोधी भूमिका घेतली, असा आरोप बन यांनी केला.
नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा असा संघर्ष असल्याचा हास्यास्पद दावा संजय राऊत करताय. हा उबाठा गट नाही तर हा भाजपा आहे. इथे देश प्रथम ही भूमिका असते. एकमेकांची गचांडी धरण्याचा आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी विरुद्ध संजय राऊत असा सामना या पक्षात होत नाही. महिला आरक्षण विधेयक कुठल्या पक्षाच्या हिताचे नव्हे तर महिलांच्या हिताचे होते आणि दुर्दैवाने इंडिया आघाडी, उबाठा गटाने त्याला विरोध केला. महिलांविरोधात आपल्या पक्षात काय चाललेय ते पहा आणि मगच भाजपावर टीका करा; असा घणाघात बन यांनी केला.
उबाठा गटाच्या नेत्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना आरसा दाखवला. संजय राऊत, मुख्यमंत्र्यांचे ट्वीट बघण्याऐवजी काल प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेले ट्वीट बघा, तुमचे डोळे उघडतील. त्यांनी महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम केले. देशहिताची आणि नारीशक्तीच्या हिताची भूमिका घेतल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. संजय राऊत, तुम्हाला नारी शक्तीचा अभिमान नाही, आदर वाटत नाही म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केल्याचे बन म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मांतराचा प्रकार झाल्याचे नव्हे तर लैंगिक शोषणाचे प्रकरण झाले होते आणि त्यात रीतसर चौकशी केल्याचेही सांगितले. संजय राऊत, लैंगिक प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर पाटकर फाइल्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने एका महिलेवर अन्याय केला, शिवीगाळ करत धमकावले ते फाइल्सच्या ऑडीओमध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे. अमृता फडणवीस यांनी सांगितलेल्या ॲक्सिस बँकेतील त्या प्रकरणाची चौकशी झाली. मात्र टीसीएस प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय, असा सवाल करीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या धर्मांतर प्रकरणाबद्दल मूग गिळून गप्प बसलेल्या उद्धव ठाकरेंना एकदा त्यावर बोलायला सांगा, असे आवाहन बन यांनी केले.