मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र २२ तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल, अशी माहिती मंत्रालयातील आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.