मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील दोघांचा उष्माघाताने बळी गेला आहे. राज्य सरकारनेही उष्माघाताने दोन बळी गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खबरदारी म्हणून राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रूग्णावर त्वरीत उपचार होण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यातील एका व्यक्तीचा धुळयातील माजी सरपंच महिलेचा उष्माघातामुळे बळी गेला आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बहुतांशवेळा एप्रिल-मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढतो. पण यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाऱ्याने विक्रमी उंची गाठली आहे. या उन्हाचा तडाखा बसून अक्कलकोट तालुक्यातील प्रसन्न बिराजदार या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. तर धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (वय ४९) यांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला होता. धुळे शहरात गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षी २८ मार्चला ४१.० इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. यंदा मात्र २८ मार्चला ४३.४ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले. ४४ अंशापर्यंत तापमान वाढल्यानंतर याचे तीव्र परिणाम येथील जनजीवनावर होतांना दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील भिरा गावात जगातील सर्वाधिक तापमानाची (४६.५) नोंद झाली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनेही नागरिकांना उन्हाच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून योग्य ती खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील दोन नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी दिली. सर्व सरकारी रूग्णालयांना उष्माघाताच्या रूग्णांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील इतर भागातही उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले व आबालवृद्धांना दाहकतेचा प्रकर्षणाने त्रास होत असून यापासून बचाव व्हावा, उष्माघाताने कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील कक्ष, आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी पत्रके, फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी चार या कालावधीत कोणी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास आपत्कालीन आरोग्य सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अकोल्यातही एकाचा मृत्यू : अकोल्यामध्ये उष्मघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे.
राज्यातले तापमान : अकोल ४४ अंश, यवतमाळ ४३. २ अंश, अमरावतीत ४३ अंश, जळगाव ४२.५ अंश, मालेगाव शहर ४२ अंश, बीड जिल्हा ४१ अंश, ठाणे जिल्हा ४० अंश
बीड जिल्ह्यातील बाजारपेठेत वर्दळ कमी : बीड जिल्ह्यातील तापमानातमंगळवारपासून वाढ होऊ लागली आहे. बुधवारी दुपारी तापमान तब्बल ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून या वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे बाजारपेठेत आणि रस्त्यावर लोकांची गर्दी कमी दिसत आहे. तापमान वाढल्याने आरोग्य विभागाने आवश्यकता असेल तर बाहेर पडा, आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
जळगाव शहरात रस्त्यावरील डांबर वितळले : जळगाव मध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा ४२.५ अंशांवर पोहोचला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके तसेच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरातील रस्त्यावरील डांबरही वितळत असून प्रसरण पावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत.
ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर : हवामान खात्याने आज आणि उद्या देखील ठाणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून उद्याही ४० अंशापर्यत° तापमान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक विद्यार्थी आणि ठाणेकर थंड शीतपेय पिताना दिसत आहेत. उष्णतेचा फटका रस्त्याने चालत जाणाऱ्या आणि वाहन चालकांना देखील बसताना दिसत आहे ..त्यामुळे डोक्यावरती टोपी ,तोंडावर स्कार्फ महिला लावून ठाणेकर प्रवास करताना दिसत आहे.