मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के इतका लागला असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगती दर्शवली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांमधून एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.
मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने ह्या विद्यार्थीनीने ९७.८ टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच महानगरपालिकेच्या पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के), राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के), पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के), मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले.
चार शाळांचा १०० टक्के निकाल तसेच मुंबई महानगरपालिकेच्या भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर) मिठा नगर (मुलुंड) पुनम नगर (अंधेरी) या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचे निकालातून दिसून आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फलित आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर तसेच शिक्षण अधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.