ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू करण्याचे प्रयत्न चालले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी पोलीस तसेच प्रशासनाच्या सहकार्याने हे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला ठाण्यात मोठे यश मिळाले. ठाणे पोलिसांनी धडक कारवाई केली. एका गोदामातून LPG सिलिंडरचा बेकायदेशीररित्या ठेवलेला मोठा साठा जप्त केला. हा साठा जप्त करून पोलिसांनी LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव उधळला.
ठोस माहिती मिळताच ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी धडक कारवाई केली. कापूरबावडी परिसरात डॉमिनोज जवळ असलेल्या एका गोदामात पोलिसांनी तपासणी केली. या गोदामात LPG सिलिंडरचा बेकायदेशीररित्या ठेवलेला मोठा साठा आढळला. हा साठा पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेले सिलिंडर काळाबाजार करून चढ्या दराने विकण्याच्या हेतूने गोदामात बेकायदेशीररित्या ठेवले होते. या प्रकरणी तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण विरोधात युद्धाला सुरुवात केली. युद्धाला सुरुवात होताच इराणने त्यांच्या देशाच्या अतिशय जवळ असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर कठोर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. भारत आयात करत असलेल्या गॅस, कच्चे तेल आदी ऊर्जेशी संबंधित मालाची सुमारे २० टक्के वाहतूक होर्मुझमार्गे होते. यामुळे युद्धाचा फटका भारताला बसेल असे वातावरण सुरुवातीला काही जणांनी निर्माण केले. अफवा पसरवून सिलिंडर, इंधन यांची साठेबाजी करून काळाबाजार करण्याचे नियोजन सुरू केले. पण केंद्र सरकार वेळीच सावध झाले. एकाचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशांतर्गत वेगवेगळ्या पातळ्यांवर समन्वय ठेवून सरकारने टंचाईचे मोठे संकट निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली. साठेबाजी करणाऱ्यांना शोधून बेकायदेशीररित्या केलेला साठा जप्त करायला सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत ठाण्यातील चितळसर पोलिसांनी कापूरबावडी परिसरात डॉमिनोज जवळ असलेल्या एका गोदामावर धाड टाकली. धाड टाकून पोलिसांनी LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव उधळला. या प्रकरणात धरपकड सुरू आहे.