Tuesday, April 14, 2026

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निशांत राजेश ठाकरे (रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह पर्यटनासाठी कोकणात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास निशांत आपल्या मित्रांसोबत आरे बीचवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समुद्रातील पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात ओढला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो सापडला नाही. घटनेनंतर तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निशांतच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनाऱ्यावर पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा