मुंबई : नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडल्याच्या धक्कादायक प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणींना लक्ष्य करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. "कंपन्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा असावी, जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, धर्मांतराचा दबाव आणि शारीरिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध विशेष पथकामार्फत कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कृष्णराज महाडिक म्हणाले, "नाशिकमधील ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मॅनेजमेंटमधील लोकांनी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून महिलांचे शोषण केले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कंपन्यांनी तत्काळ कामावरून काढून टाकावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ज्या महिलांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटत असेल, त्यांनी न घाबरता भाजप युवा मोर्चाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
.......
आतापर्यंत पाच जणांना अटक
गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवून तक्रार केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.