कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे. नोगो चिम्पांजी प्रजातीचे जवळपास २०० सदस्य अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र आता त्यांचे दोन गट पडले असून त्यांच्यात रक्ताचा थरार सुरु झाला आहे. युगांडाच्या किबाले राष्ट्रीय उद्यानात सुरु असलेलं चिम्पांजीमधलं हे युद्ध सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
चिम्पांजी यांचे २ गट पडले आहेत. त्यांच्यात सुरु असलेला संघर्ष साधा नाही. एका सुनियोजित रणनितीनं त्यांचे हल्ले सुरु आहेत. एक गट दुसऱ्या गटाच्या सदस्यांना चहूबाजूंनी घेरून संपवत आहे. यात आतापर्यंत २८ चिम्पांजी मारले गेले आहेत. विशेष म्हणजे आज एकमेकांच्या जीवावर उठलेले चिम्पांजी कधीकाळी एकमेकांचे जवळचे साथीदार होते. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. पण आता त्यांच्यात तीव्र संघर्ष सुरु झाला आहे.
युगांडाच्या किबाले राष्ट्रीय उद्यानात चिम्पांजींच्या २ गटांमधील संघर्ष टोकाला पोहोचला असून एकाच प्रजातीतील चिम्पांजी एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. नोगो नावाच्या प्रजातीमधील २२० चिम्पांजी कधीकाळी एकत्र राहायचे. मात्र आता त्यांच्यात फूट पडली आहे. या संघर्षात आतापर्यंत २८ चिम्पांजींचा बळी गेलेला आहे. त्यात लहान चिम्पांजींचाही समावेश आहे. तर अनेक चिम्पांजी गायब आहेत. त्यांना मृत मानलं जात आहे.
चिम्पांजी यांचे वेस्टर्न आणि सेंट्रल असे २ गट पडले आहेत. यातील वेस्टर्न नावाचा लहान गट अतिशय आक्रमक आहे. या गटातील चिम्पांजी अगदी एका रेषेत शत्रूवर हल्ला करतात. त्यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं सेंट्रल गटाचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे कधीकाळी हे सगळे चिम्पांजी एकत्र गुण्यागोविंदानं राहायचे. मात्र हळूहळू नात्याला तडे जाऊ लागले. मैत्रीचं रुपांतर शत्रुत्वात झालं.
२०१९ मध्ये एका नर चिम्पांजीच्या हत्येनं संघर्ष अधिक पेटला. या चिम्पांजीची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली. त्या हल्ल्यावेळी एकजण आपल्या मित्रासोबतच थांबला. त्यानं आपल्या मित्राचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, हा संघर्ष अनेक वर्षे जुना असून २०१४ मध्ये काही वृद्ध आणि महत्त्वाचे असलेले चिम्पांजी मरण पावले. याच चिम्पांजींनी सगळ्या समूहाला एकत्र ठेवलं होतं. यानंतर नेतृत्व बदललं. एका नराकडे नेतृत्व गेलं. त्यानंतर संतुलन बिघडलं. यासोबतच आजारांमुळे काही चिम्पांजींचा मृत्यू झाला. त्यामुळे संतुलन आणखी बिघडलं आणि हा संघर्ष घडून आला.