'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे उद्घाटन;
मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीत वारंवार अडथळा ठरणाऱ्या 'बँडविड्थ'च्या समस्येवर आता प्रभावी तोडगा काढला जाणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रक्रियेत अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत, अत्याधुनिक इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता असलेली डेटा सेंटर्स शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.
यवतमाळच्या सौर प्रकल्पातून ऊर्जेची पूर्तता
पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा भाग म्हणून या डेटा सेंटरसाठी लागणारी ६० टक्के ऊर्जा सौर प्रकल्पातून मिळविली जात आहे. यासाठी यवतमाळ येथे २६.६ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करतानाच ऊर्जेची शाश्वतता जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी बँडविड्थ वाढवणे गरजेचे आहे. इक्विनिक्सच्या या प्रगत केंद्रामुळे सरकारी प्रणालींची कार्यक्षमता वाढेल आणि पर्यायाने सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल.