Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने अखेर पडदा टाकला आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी एका विशेष गॅझेट नोटिफिकेशनद्वारे अमरावती (Amravati) शहराला राज्याची अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संसदेने 'आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक २०२६' मंजूर केल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारने तत्काळ ही अधिसूचना लागू केली आहे. या निर्णयामुळे आता आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा सर्व तांत्रिक आणि राजकीय संभ्रम कायमचा संपुष्टात आला असून, अमरावतीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.



'तीन राजधानी'च्या चर्चांना पूर्णविराम


२ एप्रिल रोजी लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेयकाला आवाजी मतदानाने संमती देण्यात आली. या ऐतिहासिक मंजुरीमुळे आता राज्यात यापुढे 'तीन राजधानी'चे मॉडेल राबवण्याचे किंवा राजधानी बदलण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आले आहेत. कायदा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जरी हे विधेयक आता मंजूर झाले असले तरी, हा सुधारित कायदा २ जून २०२४ पासून लागू झाल्याचे मानले जाईल. २०१४ च्या मूळ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्यात दुरुस्ती करून हा मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे आता अमरावतीच्या राजधानी पदावर कोणतीही कायदेशीर टांगती तलवार उरलेली नाही.



YSRCP चा केंद्राच्या निर्णयाला कडाडून विरोध


केंद्र सरकारने अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा दिल्यानंतर आता आंध्र प्रदेशात राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने (YSRCP) या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला विरोध दर्शवला आहे. "या निर्णयामुळे राजधानीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाले आहे," असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासाची मुहूर्तमेढ २०१५ मध्ये तत्कालीन तेलगू देसम पक्षाच्या (TDP) कार्यकाळात रोवण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होऊन वायएसआर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी 'तीन राजधानी'चे मॉडेल मांडले होते. यामुळे अमरावतीचा मुख्य प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून अधांतरी होता. आता केंद्राच्या नव्या कायद्यामुळे जगनमोहन रेड्डी यांच्या 'तीन राजधानी'च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला मोठा धक्का बसला असून, राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.



NDA सरकारच्या निर्णयामुळे विकासकामांना वेग


२०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर, सरकारने 'एकच राजधानी' म्हणून अमरावतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेले सर्व प्रलंबित प्रकल्प आता युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. एकाच मजबूत राजधानीमुळे राज्याच्या प्रशासनात अधिक सुसूत्रता आणि स्थैर्य येईल, अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. राजधानीच्या निश्चितीमुळे केवळ पायाभूत सुविधांचे कामच मार्गी लागणार नाही, तर राज्याच्या एकूणच प्रशासकीय कारभाराला मोठी चालना मिळणार आहे. गुंतवणुकीचे आणि विकासाचे केंद्र म्हणून अमरावतीला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील

BRICS : ब्रिक्स प्लस देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी 'न्यायनॉमिक्स' अन् 'न्याय सेतू'

नवी दिल्ली :  ११ व्या ‘ब्रिक्स प्लस लिगल फोरम’च्या उद्घाटनाप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

LPG Pipeline : देशातील सहा राज्यांमध्ये LPG पाइपलाइनचा विस्तार, केंद्राकडून ७ हजार कोटींची गुंतवणूक आणि १,८०० किमी नव्या पाइपलाइनला मंजुरी

नवी दिल्ली : देशातील एलपीजी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.