नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक क्रांतिकारी बदल केला असून 'ऑन-स्क्रीन मार्किंग' (OSM) पद्धत अंमलात आणली आहे. या नवीन उपक्रमांतर्गत, सुमारे १ कोटी उत्तरपत्रिकांची ३२ कोटी पाने स्कॅन करण्यात आली असून, शिक्षक आता संगणकावरच या उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहेत. परीक्षा केंद्रांवरच या उत्तरपत्रिकांचे डिजिटल स्वरूपात जतन करून मूल्यांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद केली जात आहे. ही डिजिटल तपासणी म्हणजे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले महत्त्वाचे पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १२वीच्या यशानंतर, हीच पद्धत १०वीच्या बोर्ड परीक्षांसाठीही लागू करण्याचा मंडळाचा मानस आहे. अनेक शिक्षण मंडळांनी आधीच या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे मानवी चुका कमी होऊन निकाल अधिक अचूक आणि वेळेत लागण्यास मदत होईल. शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणे तंत्रज्ञान-आधारित करण्याच्या या निर्णयामुळे भविष्यात उत्तरपत्रिका तपासणीची संपूर्ण पद्धत बदललेली पाहायला मिळणार आहे.
AI देणार गती, पण शिक्षकच असणार 'बॉस'...
उत्तरपत्रिकांचे 'डिजिटल' रूपांतर
सीबीएसई बोर्डाच्या मूल्यांकन प्रक्रियेत आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. या नव्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका प्रथम स्कॅन करून त्यांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर केले जात आहे. सध्या शिक्षक या डिजिटल उत्तरपत्रिका संगणकाच्या स्क्रीनवर तपासून गुण देत आहेत. पुढील टप्प्यात हे काम अधिक सोपे करण्यासाठी प्रगत 'एआय' (AI) सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांची उत्तरे वाचून त्यांचे खोलवर विश्लेषण करेल. ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यत्वे तीन स्तरांवर कार्य करणार असून, यामुळे मानवी श्रमात बचत आणि निकालात अधिक अचूकता येण्याची शक्यता आहे.
हस्ताक्षर ओळख
एआय विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे मजकुरात रूपांतर करेल. आधुनिक प्रणाली हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा समजण्यास सक्षम आहेत.
आता 'AI' ओळखणार उत्तरांतील की-वर्ड्स
सीबीएसईच्या नव्या 'आशय विश्लेषण' तंत्रज्ञानामुळे आता उत्तरपत्रिका तपासणी अधिक अचूक होणार आहे. हे प्रगत सॉफ्टवेअर आदर्श उत्तरांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील महत्त्वाचे शब्द (Keywords), सूत्रे, आकृत्या आणि पायऱ्या तंतोतंत ओळखेल. या तांत्रिक विश्लेषणानंतर, सॉफ्टवेअर परीक्षकांना 'प्राथमिक गुण' सुचवेल, ज्यामुळे मानवी चुका टाळता येतील आणि मूल्यमापन प्रक्रियेला मोठी गती मिळेल.
स्मार्ट मार्किंग आणि मॉडरेशन
उत्तर केवळ लांबी वाढवणारा मजकूर नसून विषयाशी संबंधित आहे की नाही, हे देखील एआय तपासू शकते.
लांबलचक उत्तरांऐवजी 'टू द पॉईंट' मांडणीवर भर
आता केवळ पाने भरण्यापेक्षा अचूकता आणि स्पष्टतेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. तज्ज्ञांच्या मते, या प्रणालीमुळे विद्यार्थी खालील आधुनिक लेखनशैलीचा अवलंब करतील. उत्तरे मुद्द्यांमध्ये लिहिण्यावर भर, योग्य शीर्षक आणि उपशीर्षकांचा वापर, महत्त्वाचे शब्द आणि तथ्यांचा समावेश, गणिते किंवा शास्त्रामधील उत्तरे स्टेप-बाय-स्टेप मांडणे,
पारंपारिक तपासणीतील त्रुटींना मिळणार फाटा
दरवर्षी लाखो उत्तरपत्रिका तपासण्याचे मोठे आव्हान बोर्डासमोर असते. पारंपारिक पद्धतीत मूल्यमापनाला लागणारा प्रचंड वेळ, परीक्षकांनुसार बदलणारी गुणदान पद्धत आणि बेरीज करताना होणाऱ्या मानवी चुका, यामुळे निकालात अनेकदा त्रुटी निर्माण होतात. परिणामी, फेरतपासणीचे (Revaluation) प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर, 'एआय-आधारित प्रणाली' हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. हे तंत्रज्ञान केवळ प्रक्रियेला गतीच देणार नाही, तर गुणदानातील तफावत आणि मानवी चुका कमी करून निकाल अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी मदत करेल.