माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.
कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.
प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.