मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात नालेसफाई आठवली. मिठी नदीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होवून एक ते दोन दिवस होत नाही तोच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मिठी नदीच्या गाळ सफाईची पाहणी केली. मुळात नालेसफाईचे काम ६० ते ७० टक्के झाल्यानंतर पाहणी करणाऱ्या एकेकाळच्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षात बसताच मिठी नदीच्या सफाईची आठवण एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवडयात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्या सत्ताकाळात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नाल्यातील गाळाची पाहणी करण्याची एवढी काय घाई असा सवाल आता मुंबईकरांकडून केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्यासह गुरुवारी मिठी नदीच्या गाळाची सफाईची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे करण्यात येणाऱ्या मिठी नदी स्वच्छता व नालेसफाई कामांची पाहणी केली. यावर्षी कामे उशिरा सुरु झाल्यामुळे प्रत्यक्ष स्थळी जावून कामांचा आढावा घेतला आणि कामे योग्य वेळेत व नियोजनबध्द पध्दतीने पूर्ण व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या असे त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टवर म्हटले आहे.
विशेष म्हणजे मागील २५ वर्षांपासून म्हणजे ७ मार्च २०२२पर्यंत मुंबई महापालिकेत उबाठाची सत्ता होती. परंतु नालेसफाईच्या कामांचे कंत्राट दिल्यानंतर कधीही नाले तसेच मिठी नदीच्या कामांच्या ठिकाणी जावून ही कामे योग्य वेळेत आणि नियोजनबध्द पध्दतीने करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या नव्हत्या. परंतु आता विरोधी पक्षात बसताच त्यांना या सफाईच्या कामाला सुरुवात होताच नाले आणि मिठी नदीच्या काठावर जावे लागले. परंतु आपल्या सत्ता काळात सफाईचे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्यानंतर आणि जिथे अधिकारी सांगतील तिथेच जावून कशाप्रकारे योग्यप्रमाणे सफाई केली जाते,हे माध्यमांना तिथे नेवून सांगणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्यासह तत्कालिन उबाठाचे महापालिकेतील नेते यांना नालेसफाई आणि मिठी नदीचे काम कधीपर्यंत पूर्ण केले जाते याची कल्पना नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची अतिघाई ही मुंबईकरांना यंदा पुरात लोटले जाणार नाही या चिंतेपोटी आहे की कंत्राटदाराला दमात घेवून त्यांनी काम करू नये यासाठी आहे की गाळातील सफाईत यंदा काही मिळणार नाही या चिंतेपोटी आहे असा सवाल आता अप्रत्यक्ष नागरिकांकडून केला जात आहे.