नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून तब्बल १७ पदकांची कमाई केली आहे. यात चार सुवर्ण पदकांची समावेश आहे. देशपातळीवर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री ( स्वतंत्र कार्यभार) जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला. येत्या सप्टेंबर महिन्यात चीन मधील शांघाय येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार यात भारतीय चमू देखील सहभागी होणार आहे.
कौशल्य प्रशिक्षण हे केवळ रोजगारासाठी नसून राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. यात कौशल्यधारित प्रशिक्षण महत्वाचे योगदान देणार असल्याचे लोढा म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी ' पीएम सेतू ' योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. याच धर्तीवर राज्यात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विकासाचे अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात असून आज मिळालेली पदके त्याचेच द्योतक असल्याचे ही लोढा यांनी नमूद केले.
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण १७ पदके जिंकून उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी उत्कृष्टता आणि समर्पणाचे प्रतीक असून सर्व पदक विजेत्यांना आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून प्रगत प्रशिक्षण दिले जाईल, आणि सर्वोत्तम कामगिरी करणारे स्पर्धक शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात नव्या भारताचे प्रतिबिंब आहे. भारतीय कौशलद्यधारित प्रशिक्षित तरुण आज जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे विविध उद्योगात महत्त्वाच्या पदांवर आहेत. आगामी जागतिक कौशल्य स्पर्धेतही भारतीय विद्यार्थी देदीप्यमान यश मिळवतील असा विश्वास केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय कौशल्य विभागाकडून कांस्य पदक विजेत्यांना ५० हजार, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहितीही चौधरी यांनी दिली. राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेच्या या सांगता समारंभाला राजस्थानचे कौशल्य विकास मंत्री राज्यवर्धन राठोड, बिहारचे मंत्री संजय सिंग टायगर , हरियाणाचे मंत्री गौरव गौतम, उत्तर प्रदेशचे युवक कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.