मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम तसेच राज्यभरातील परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
“परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात काही परदेशी नागरिकांनी रहिवासी दाखले मिळवून रिक्षा व टॅक्सी परवाने प्राप्त केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मागील काही वर्षांत दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश देत या मोहिमेची सुरुवात मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातून करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मीरा-भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येईल यासाठी महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्याचेही आदेश देण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.