मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर संधी मिळावी, यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या ९ पैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. अशावेळी राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता आपले संपूर्ण लक्ष विधान परिषदेवर केंद्रित केले असून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतल्याचे समजते.
विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपात असलेल्या इच्छुकांच्या लांबलचक यादीमुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.
भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाच्या धोरणानुसार यातील किती जणांना पुन्हा संधी मिळते आणि किती जणांचा पत्ता कट होतो, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः प्रादेशिक समतोल आणि जातीचे समीकरण पाहता पक्ष नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार की जुन्यांनाच कायम ठेवणार, याची उत्सुकता वाढली आहे.
इच्छुकांची यादी : भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधवी नाईक यांसारख्या संघटनात्मक नेत्यांसोबतच रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, महायुतीच्या जागावाटपामुळे विधानसभेत ज्यांना संधी मिळू शकली नाही, अशा मातब्बर नेत्यांनीही फिल्डिंग लावली आहे. अशावेळी पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी द्यायची की निवडणुकीतील गणिते पाहून नवीन उमेदवारांना मैदानात उतरवायचे, यावरून भाजपात सध्या खल सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस भाजपातील 'वेटिंग लिस्ट'मधील नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.