चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांसारख्या खुणा झाल्या आहेत. अशातच आता खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बर याच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. एक पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.
खालिस्तानी दहशतवाद्याच्या पोस्टमध्ये काय?
या हल्ल्याची जबाबदारी एका खालिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे. त्याच्या वतीने असे लिहिले आहे की – सुखजिंदर सिंग बब्बर १ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड सेक्टर-३७ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतो. आम्ही भारतीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की, पंजाबमधील शीख तरुणांना संपवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी, दशमेश पित्याचा खालसा पंथ याला सडेतोड उत्तर देईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे- गुरदासपूरमध्ये रणजीत सिंगच्या मारेकऱ्यालाही सोडले जाणार नाही. पंजाबची भूमी खालसाची भूमी आहे. पंजाबमध्ये खलिस्तान बनेल. खलिस्तान जिंदाबाद. खालसा राज्य करेल.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांकडून नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.
रणजीत सिंग कोण आहे?
२२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरदासपूरमधील एका गावात एका एएसआय आणि एका होमगार्ड जवानाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रणजीत सिंग नावाच्या तरुणाला पकडले. पोलिसांनी सांगितले होते की, त्यानेच दोघांची हत्या केली. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय हँडलर्सशी संबंध आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी रणजीतला हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. कुटुंबाचा आरोप होता की हा बनावट एन्काउंटर आहे. १२ दिवसांपर्यंत कुटुंबाने अंत्यसंस्कार केले नव्हते. या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.