नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नुकतंच अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सवर या द्रुतगती मार्गाच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना म्हटले आहे की, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
काय म्हणाले नितीन गडकरी?
मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये १०९ किमी लांबीच्या, चार पदरी अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे (NE-08) उद्घाटन केले. अहमदाबाद आणि उदयोन्मुख धोलेरा प्रदेशादरम्यान अखंड संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो आणि धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (DSIR) तसेच आगामी धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे सुलभ होते."
गडकरी म्हणाले, "सध्याच्या शहरी मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला आहे. या द्रुतगती मार्गामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. गुंतवणूक आकर्षित करून आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हा मार्ग सज्ज आहे. याव्यतिरिक्त, हा मार्ग मालवाहतूक आणि व्यापाराला गती देईल, लोथलसारख्या प्रमुख ठिकाणांना उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि संपूर्ण गुजरातमध्ये औद्योगिक, प्रादेशिक आणि पर्यटन विकासाला चालना देईल."
नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधानांनी गुजरातमध्ये १०९ किलोमीटर लांबीच्या, चार पदरी अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे (एनई-०८) उद्घाटन केले. हा मार्ग चार टप्प्यांमध्ये विकसित करण्यात आला आहे.
टप्पा १ – २२ किमी लांबीचा सरदार पटेल रिंग रोड – सिंधरेज गाव विभाग
टप्पा २ – २६.५ किमी लांबीचा सिंधरेज गाव – वेजल्का गाव विभाग
टप्पा ३ – २२.५ किमी लांबीचा वेजल्का गाव – डीएसआयआर झोन (अहमदाबाद जिल्हा) विभाग
टप्पा ४ – ३८ किमी लांबीचा डीएसआयआर झोन (अहमदाबाद जिल्हा) – अढेलई गाव (भावनगर जिल्हा) विभाग
काय फायदे होतील?
अहमदाबाद आणि धोलेरा दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी राहणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो. धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर) आणि आगामी धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दळणवळणाला चालना मिळेल. शहरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच प्रदूषण कमी होईल आणि वाहतूकही सुरळीत होईल. गुंतवणूक आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच आर्थिक वाढीला चालना मिळेल. जलद मालवाहतूक आणि व्यापारामुळे दळणवळण सुलभ होते, परिणामी औद्योगिक आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे लोथलसारख्या प्रमुख ठिकाणांशी संपर्क सुधारेल आणि परिणामी या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल.