मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांचे अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे खासगी शाळांमधील आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते.
यंदा राज्यातील आठ हजार ७०१ शाळांमध्ये एक लाख १४ हजार ८३३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याचे शिक्षण विभागाने घातलेले बंधन उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर शिक्षण विभागाने एक किलोमीटरची मर्यादा काढून अर्ज भरण्यासाठी पालकांना संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्याला पुन्हा मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीपर्यंत दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या प्रवेशासाठी जवळपास तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यंदा अर्जांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.