पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे ४ हजार ८९८ कोटी रुपये थकीत ठेवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळेवर परतफेड करण्याची बँकांची ३१ मार्च ही अखेरची तारीख आहे. कारखान्यांनी संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहण्याची दाट शक्यता असून साखर आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
थकीत एफआरपीप्रश्नी संबंधित कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या असून ३१ मार्चअखेरचा थकीतचा आकडा कमी होणे अपेक्षित आहे. कारखान्यांनी सुनावण्यांमध्ये रक्कम देण्याचे कबूल केले होते. एफआरपीची रक्कम वेळेत देण्याचे कारखान्यांवर बंधनकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर मागील आठवड्यात संयुक्त बैठक झालेली आहे. पुढील आठवड्यात थकीत एफआरपीचा पुन्हा आढावा घेऊन संबंधितांच्या सुनावण्या होतील व पुढील कारवाईची भुमिका ठरवू असे पुणे.साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले .