मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे लवकरच आणखी एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
'अगंबाई…अरेच्चा!', 'बाईपण भारी देवा' आणि 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या यशस्वी सिनेमानंतर आता 'आई भाड्याने हवी?' या नव्या सिनेमाची दिग्दर्शक केदार शिंदेंनी घोषणा केली आहे.
सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या सिनेमाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं असून या सिनेमाचे छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त हे पुन्हा एकदा एकत्र येत असल्यानं सिनेमाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
'आई भाड्याने हवी?' या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होत असून आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत 'आई' या नात्याची गरज, उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा सिनेमा परिणामकारक पद्धतीनं भाष्य करणार असल्याचं दिसून येत आहे. 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमानंतर आता 'आई भाड्याने हवी?' या सिनेमाची कथा नेमकी काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.