मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात गारपीटीसह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस गारपीटसह पावसाचे संकट काय आहे. २१ मार्च ते २५ मार्चदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भात काही जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. पुढील दोन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.