कोकणातून हापूसची १३ हजार ९२५ पेट्यांची आवक
परराज्यातील हापूसची १० कोटींना विक्री
कोकणच्या हापूसमुळे २२ कोटी ५० लाखांची उलाढाल
नवी मुंबई : हापूसने मुंबईकरांचा गुढीपाडव्याचा गोडवा चांगलाच वाढवला. सुमारे ३२ कोटींच्या हापूसची गेल्या आठवडाभरात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईत विक्री झाली आहे. अंदाजे ९० हजार डझन हापूस मुंबईकरांनी गुढीपाडव्याला फस्त केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी कोकण हापूसची १३ हजार ९२५ पेट्यांची आवक फळ बाजारात झाली, तर गेल्या दहा दिवसांत एपीएमसीतून ९० हजार डझन कच्च्या हापूसची विक्री झाली होती. तोच पिकलेला हापूस आंबा गुरुवारी बाजारात अडीच हजार रुपये डझन दराने विक्री केला असून यातून २२ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल झाली, तर परराज्यातील कर्नाटक हापूसची १० कोटींची अशी एकूण ३२ कोटी ५० लाख रुपयांचे हापूस मुंबईकरांनी आज गुढीपाडव्याला फस्त केले, अशी माहिती घाऊक व्यापारी व मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तब्बल ४० हजार पेट्यांनी यंदा घटली आहे.
गुढीपाडव्याला फळबाजारात कोकण हापूसच्या १३ हजार ९२५ पेट्यांची, तर परराज्यातील १० हजार ८७५ क्रेट मिळून एकूण २४ हजार ८०० पेट्या दाखल झाल्या होत्या. हापूसचे दर ५ ते ९ डझनाच्या पेटीचे २ ते ८ हजार रुपये असल्याचे घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांत कोकण हापूसच्या केवळ २६ हजार २७३ पेट्यांची, तर परराज्यातील हापूसचे १ लाख ७ हजार ७१२ क्रेडची आवक झाली होती. त्यापैकी मागील दहा दिवसांत कोकणातून झालेल्या आवकचे ९० हजार डझन कच्चे आंबे किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापाऱ्यांनी पिकवले आणि मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी गुढीपाडव्याला तयार माल विकला. मुंबईसह उपनगरात तीन दिवसांत तब्बल २२ कोटी ५० लाख रुपयांचा कोकण हापूस विकला गेला असल्याची माहिती घाऊक व्यापारी नरेंद्र हांडे यांनी दिली.
बाजार समितीमध्ये २० ते २५ व्यापारी तयार माल विक्री करतात. तीन दिवस आधीच काही व्यापाऱ्यांनी माल तयार करून ऑर्डरनुसार मॉल मोठ्या व्यापाऱ्यांना पाठवला. साधारणत: २० एप्रिलपर्यंत देवगड, राजापूर हापूसची आवक होईल. त्यानंतर १५ एप्रिलपासून रत्नागिरी गावदरीतील आंबा विक्रीसाठी बाजारात येईल. २० एप्रिलपासून श्रीवर्धन, बागमांडला, मुरुड, अलिबाग, दापोली, बाणकोटच्या आंब्यांची आवक सुरू होईल. गुढीपाडव्याला अडीच हजार रुपये डझन दराने मुंबईसह उपनगरात हापूस विकला आहे. कच्चा हापूसपेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दर फिकवलेल्या हापूसच्या पेटीचे होते, तर एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडे तयार हापूस नसल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले असल्याची माहिती घाऊक व्यापारी शिवाजी महाडिक यांनी दिली.