पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा केली. या संवादात पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थिती, प्रादेशिक तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेवर सविस्तर विचारविनिमय झाला.
या वेळी पंतप्रधानांनी ईदच्या निमित्ताने आगाऊ शुभेच्छा देत दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची भावना व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी अलीकडील घडामोडींवर चिंता व्यक्त करत प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवादाची गरज अधोरेखित केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुवेतच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवरील हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड जहाजवाहतूक सुनिश्चित करणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी युवराजांचे आभार मानले. मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कुवेतमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांचे रक्षण करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल-नहयान यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली होती. त्यांनी यूएईवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवत निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल आणि नागरी पायाभूत सुविधांच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.