मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला. तर मध्यावर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं चिंता वाढवली आहे. १८ ते २० मार्चदरम्यान राज्यातील विविध ठिकाणी वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. काही भागांत यलो अलर्ट जारी केला असून मंगळवारचं हवामान अपडेट जाणून घेऊयात.
उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पाऊस विदर्भाला झोडपून काढत आहे. आज नागपूरसह 7 जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. दिवसाचे कमाल तापमान ३२-३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यात देखील नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होईल. छत्रपती संभाजीनगरसह, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान २८-३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जगळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३०-३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. तुरळक पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकणात मंगळवारी हवामान उष्ण आणि कोरडं राहील. गेल्या काही काळात असणारी दमट हवामानाची तीव्रता कमी झाली आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. तर १८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उष्णतेची लाट, गारपीट, अकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचं संकट आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके आणि फळ बागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी.