मुंबई : ' पाणी फाउंडेशन' ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य शासनाच्या समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता
कमी करण्यात मदत केली.यापुढेही पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंत्रालयात आयोजित बैठकीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाच्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, तसेच अमित चंद्रा, विलास शिंदे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान विषयक संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे मत केले आहे त्यामुळे राज्यात ८० टक्के पाऊस होईल, असे गृहीत धरून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे. पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षीही शेतकरी, ग्रामस्थ जलसाक्षर होतील.
पाण्याचे महत्व ओळखून फाउंडेशन काम करत आहे. या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी फाउंडेशनला मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. फाउंडेशन राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी, त्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सादरीकरण केले. यावेळी संस्थापक आमिर खान, किरण राव, अमित चंद्रा यांनीही जलसंधारणाची कामे प्रभावी होण्यासाठी मते व्यक्त केली. फाउंडेशनने राज्यामध्ये स्वयंसेवक तत्त्वावर १३ हजार १२१ शासकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. तसेच फार्मर कप निवासी प्रशिक्षणासाठी १६ हजार २६० शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये ५७.५६ टक्के महिला शेतकरी आहेत तसेच ११ हजार ९५ निमंत्रकांनी नोंदणी केली आहे.