नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कोकणच्या लाल मातीतील अस्सल हापूस आंब्याची नवी मुंबईतील एग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बाजारपेठेत मोठी एन्ट्री झाली आहे. सोमवारी बाजारपेठेत तब्बल ६,००० पेट्यांची आवक झाली असून, चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक मानली जात आहे. यंदा कोकणात वातावरणात वारंवार होणारे बदल, अनपेक्षित धुके आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब झाला असून, कोकणातील बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आवक वाढली असली तरी दर्जेदार आंब्याचे प्रमाण मर्यादित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
खिशाला बसणार 'चटका'
बाजारात आवक वाढल्याने दर कमी होतील अशी अपेक्षा खवय्यांना होती, मात्र सध्या तरी दर चढेच आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठेत एका पेटीचा दर ४,००० ते ९,००० रुपयांच्या घरात आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असली, तरी उत्पादनातील घट पाहता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणातील शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी दराची फारशी तमा न बाळगता, थोडीशी खिशाला कात्री लावून आंबा खरेदी करावा आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी केले आहे.