पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर राज्यसभेच्या निवडणुकीतही विरोधकांचा पराभव झाला आहे.
बिहारमधील रिक्त झालेल्या पाच राज्यसभेच्या जागांसाठी एनडीएने बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) प्रमुख नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, राष्ट्रीय लोक मोर्चाचे (आरएलएम) प्रमुख उपेंद्र कुशवाह (दोघेही सध्याचे राज्यसभा सदस्य) आणि भाजपचे शिवेश कुमार यांना उमेदवारी दिली होती. हे सर्वजण जिंकले आहेत.
बिहारमधील पाच जागांसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या २०२ आमदारांनी मतदान केले. महागठबंधनने एमआयएम आणि बसपला सोबत घेतले होते पण त्यांना एक जण जिंकून आणण्यासाठी ४१ मतांचे समीकरण जुळवणे जमले नाही. महागठबंधनच्या उमेदवाराला ३७ मते मिळाली. मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे सुरेंद्र कुशवाहा, मनोज विश्वास आणि मनोहर प्रसाद सिंग हे तीन आमदार आणि राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदचे (आरजेडी) फैसल रेहमान हे गैरहजर राहिले.
बिहार विधानसभेत २४३ आमदार आहेत. यापैकी २०२ एनडीएचे अर्थात राओलाचे तर ४१ विरोधकांचे आमदार आहेत. विरोधकांच्या ४१ जणांपैकी महागठबंधनचे ३५ आमदार आहेत उर्वरित आमदार इतर पक्षांचे आहेत. पण एमआयएम आणि बसपला सोबत घेऊनही विरोधकांना ४१ मतांचे समीकरण जुळवणे जमले नाही.