मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला असून त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतालाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाल्याने नागरिकांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत.
महाराष्ट्रातील काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेकांनी स्वयंपाकासाठी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापर सुरू केला आहे. मात्र हॉटेल व्यवसायिकांसह मोठ्या प्रमाणात इंधन लागणाऱ्या ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काहींनी पुन्हा पारंपारिक चुलीकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
गॅस उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाकासाठी गायी आणि म्हशीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांची मागणी वाढली आहे. चूल पेटवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी या गोवऱ्यांचा वापर केला जात असल्याने स्थानिक बाजारात त्यांची विक्री वाढली आहे.
लाकडाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. त्यामुळे चूल पेटवणे सोपे जावे आणि धूर कमी व्हावा यासाठी नागरिक शेणाच्या गोवऱ्यांचा पर्याय निवडत आहेत. सुरुवातीला अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या या गोवऱ्यांना युद्धाच्या निमित्ताने बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे.
दररोज मजुरांच्या मदतीने सुमारे ६००ते ७०० गोवऱ्या तयार केल्या जात असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यवसायिकांकडूनही मागणी वाढल्याने अनेकजण एक दिवस आधीच बुकिंग करून गोवऱ्या घेत आहेत . सध्या एका गोवऱ्याची किंमत सुमारे ७ ते १० रुपयांपर्यंत पोहोचली असून गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर या पारंपारिक इंधनाला पुन्हा मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.