मुंबई: मुंबई-पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला उघड्यावर चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांची दोन दिवसांत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुरूवारी विधानसभेत दिले. तसेच, भेसळखोरांवर कठोर कारवाईची तरतूद असलेल्या प्रस्तावित कायद्याचे प्रारूप अंतिम मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार सुनील कांबळे यांनी पुणे शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सिद्धार्थ शिरोळे, विकास ठाकरे, योगेश सागर, मनीषा चौधरी आणि सुरेश धस यांनी हॉटेलमधील निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत प्रश्न केले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी मनुष्यबळ आणि योग्य यंत्रणा नसल्याचा मुद्दा मांडला.
त्यावर उत्तर देताना झिरवळ म्हणाले की, ‘प्रशासनाकडून १९७ नवीन अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात तपासणी मोहिमेला गती येईल. तसेच, प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यापैकी पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील. तसेच, खासगी प्रयोगशाळांच्या सेवाही घेतल्या जातील.
दरम्यान, नागरिकांनी अन्न व औषधांसंदर्भात तक्रारीसाठी १८००-२२२-३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, ‘या नंबरवर फोन करून काहीच होत नाही,’ असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.