हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशन दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आपल्या मैत्रीण महिका सोबत मैदानावर रोमँटिक होताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी पांड्याने अंगावर भारतीय तिरंगा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका वकिलाने शिवाजीनगर पोलीस स्थानकात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार दाखल केली आहे.
वकिलाने केलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रध्वज परिधान करून अशा प्रकारचे वर्तन करणे हे राष्ट्रीय गौरवाचा अवमान ठरू शकते. त्यामुळे संबंधित कायद्यांतर्गत हार्दिक पांड्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर हार्दिक पांड्या किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र या घटनेवरून जोरदार चर्चा सुरू आहे.