राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसची सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप करीत मुंबईतील आमदारांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर, कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट' बसचा तुटवडा असल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुनील शिंदे यांनी बेस्टच्या खालावलेल्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर झालेल्या चर्चेत प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारून प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. त्यावर राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, मुंबईची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता शहराला किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. बेस्टने विविध कंत्राटदारांना ६ हजार ५५५ बस पुरवठ्यासाठी कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिले होते. मात्र, कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.
स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १ हजार ८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २ हजार ५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील बेस्ट बससेवेबाबत अनेक तक्रारी येत असून, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईतील सर्व स्थानिक आमदार आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मिसाळ यांनी यावेळी दिले.