गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य महिलांपासून ते महिला अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच खालच्या पातळीवर जाऊन लक्ष्य केले जात आहे. अशा प्रवृत्तींमुळे महिलांच्या मन:स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत असून, हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. सायबर गुन्हेगारी आणि महिलांविरोधी टिप्पणी रोखण्यासाठी गृहविभागासोबत विशेष समन्वय साधला जाईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत केली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला तटकरे उत्तर देत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी विविध महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यात 'उमेद मॉल' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. "पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर १३ जिल्ह्यांमध्ये हे मॉल उभारले जातील. तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये बचत गटांच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील," असे तटकरे यांनी सांगितले.
याशिवाय, मोबाईल ॲपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर लिंगनिदानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची संयुक्त समिती गठित करून कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. तटकरे म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांविषयक सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी विभाग काम करत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने वसतिगृहांची संख्या वाढवण्यात येईल. महिला लोकप्रतिनिधींचे प्रशासकीय कौशल्य आणि योगदान वाढवण्यासाठी 'यशदा'च्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणी आल्या मुख्य आर्थिक प्रवाहात
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशाचा उल्लेख करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "या योजनेमुळे राज्यातील महिला खऱ्या अर्थाने मुख्य आर्थिक प्रवाहात आल्या आहेत. योजनेचे पैसे थेट खात्यात जमा करण्याच्या अटीमुळे आजवर बँक खाते नसलेल्या तब्बल ५० लाख महिलांनी बँकांमध्ये स्वतःचे खाते उघडले आहे, ही मोठी उपलब्धी आहे."