गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी
मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही कुठेही तुटवडा पडू नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरु आहेत. कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा साठा केल्यास परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा ही साखळी तुटेल. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, माध्यमांनी पुरावा नसलेल्या गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती तयार करू नये. केंद्र सरकार याबाबत उचित काळजी घेत आहे", असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत काहीही माहिती नाही. आज मोदीजींनी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. अन्यथा, भारताची काय परिस्थिती असती, हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला, तेव्हाही भारत झुकला नाही तर, त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ करार केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनादेखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी असे भाष्य करणे हास्यास्पद आहे", अशी टीका फडणवीसांनी केली.
विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाही
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "आता विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरे तो भी टांग उपर असे विरोधकांचे सुरु आहे. जनता विरोधकांसोबत नाही. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जमीन दाखवली आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याकरिता नाही तर, निवडणूका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलन केले तरी, जनता त्यांच्यासोबत नाही," असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.