अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलसाठी टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंगचा अर्थात गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम बॅटिंग अर्थात फलंदाजी करणार आहे.
टीम इंडिया : अभिषेक शर्मा , संजू सॅमसन (यष्टीरक्षक) , इशान किशन , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , तिलक वर्मा , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , अक्षर पटेल , वरुण चक्रवर्ती , अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह
टीम न्यूझीलंड : टिम सेफर्ट (यष्टीरक्षक) , फिन ऍलन , रचिन रवींद्र , ग्लेन फिलिप्स , मार्क चॅपमन , डॅरिल मिशेल , जेम्स नीशम , मिचेल सँटनर (कर्णधार) , मॅट हेन्री , लॉकी फर्ग्युसन , जेकब डफी
कशी आहे अहमदाबादची खेळपट्टी ?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या ज्या खेळपट्टीवर खेळला जाईल ती लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणाचा वापर करून तयार केली आहे. मागच्या वर्षी आयपीएल फायनल याच खेळपट्टी झाली होती. या खेळपट्टीवर खेळलेल्या आठपैकी पाच सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये आरसीबीने २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या आणि पंजाबने धावांचा पाठलाग करताना २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. यामुळे आरसीबीचा ६ धावांनी विजय झाला.
भारतीय संघ सुपर एट फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोदी स्टेडियमवर हरला होता. तेव्हा भारताला १८८ धावा करणे जमले नव्हते. तसेच २०२३ च्या वन डे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा पराभव झाला होता. पण या दोन्ही सामन्यांसाठी खेळपट्टी पूर्ण काळ्या मातीचा वापर करून तयार केली होती. याउलट फायनलसाठी खेळपट्टी ही लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणाचा वापर करून तयार केली आहे. फायनलसाठी तयार केलेली खेळपट्टी ही धावांचा पाऊस पाडण्यासाठी उत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे रविवारी नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता जास्त आहे.
रविवारी कसे असेल अहमदाबादचे हवामान ?
रविवार ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबादमधील हवामान खूप उष्ण असेल. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस असेल. संध्याकाळी मॅचच्या वेळेत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस असेल. रात्र होऊ लागल्यावर आर्द्रता वाढू लागेल आणि रात्री ११ वाजता आर्द्रतेचे प्रमाण २७ टक्के एवढे असेल.