मुंबई: हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शव जाळणे हे महत्वाचे मानले जात आहे. मात्र, आजही मुंबईतील अनेक स्मशानभूमींमध्ये महापालिकेच्यावतीने विद्युत तसेच सीएनजीवर आधारीत दाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी अनेकांची मागणी लाकडाच्या आधारे चिता रचून शव जाळण्याची मागणी केली जाते. मात्र, मुंबईत अंत्यसंस्कारामध्ये लाकडाचा वापर केला जात असल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविकेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईतील पर्यावरणाच्या मुद्दयाला पुढे करून काँग्रेसच्या नगरसेविकेने, जर मुंबईत कचरा तसेच इतर वस्तू जाळण्यास बंदी आहे, तर मग स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे कशी जाळली जातात असा सवाल केला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नगरसेविकेकडून हा आक्षेप नोंदवल्यानंतरही भाजप, शिवसेना आणि उबाठाचे नगरसेवक तोंड गप्प करून बसले होते.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मुंबईतील महापालिकेच्या व खासगी स्मशानभूमींमध्ये महापालिकेच्यावतीने जळावू लाकडांचा मोफत पुरवठा करण्याच्या कंत्राट कामांमध्ये फेरफार करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला होता. काँग्रेसच्या नगरसेविका तुलिफ मिरांडा यांनी लाकडाच्या खर्चाबाबत कोणताही आक्षेप न नोंदवता स्मशानभूमींमध्ये पीएनजी आधारीत तसेच विद्युत दाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली तरी लाकडांची गरज का भासते असा सवाल केला. मुंबईत आज हवेतील प्रदुषण वाढले आहे. हवेतील गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा तसेच इतर वस्तू जाळण्यास पूर्णपणे बंदी आहे. जर पर्यावरणाचा विचार करता हवेतील गुणवत्ता चांगली राखण्यासाठी विकासक असो वा नागरिकांनावर जर निर्बंधा लादले जात असतील तर मग स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे का जाळली जात आहे असा सवाल केला.
आज लोकसंख्या वाढत आहे आणि अंत्यसंस्कारासाठी लाकडे जाळली जात असल्यामुळे धुर होवून हवेतील गुणवत्तेवर परिणाम होता. त्यामुळे नक्की किती लाकडे जाळली जातात याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच त्यामुळे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो, त्यात याचाही समावेश व्हायला पाहिजे असे सांगण्याचा प्रयत्न केला. तर या प्रस्तावावर बोलतांना भाजपच्या नगरसेविका राखी जाधव यांनी लाकडे ठेवण्याची जागा चांगल्याप्रकारे सुरक्षित ठेवली जात नसल्यामुळे पावसाळयात भिजली जातात किंवा ही लाकडे जाणीवपूर्वक भिजवून लाकडांचे वजन वाढवले जातात अशी बाब निदर्शनास आणून देत लाकडे ठेवण्याची जागा बंदिस्त जागा नसल्यामुळे ओली लाकडे अंत्यसंस्कारासाठी पुरवली जातात असे सांगण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे जाळण्याची प्रथा पुर्वापार असून मृताचे नातेवाईक आजही विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळे लाकडाची चिता रचून अंत्यसंस्कार करण्यावर अधिक भर असून या लाकडापासून निघणारा धूर शुध्द करून उंच ठिकाणी चिमणीद्वारे सोडला जातो. त्यामुळे हवेतील प्रदुषणात यामुळे भर पडण्याचे प्रमाण नसतानाही अशाप्रकारचा आक्षेप नोंदवल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना तसेच उबाठाच्या नगरसेवकांकडून याचा समाचार घेतला न गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रस्तावावर अध्यक्षांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी उत्तर देताना आजही नागरिकांकडून लाकडाच्या आधारे अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली जात असल्याचे सांगत लोकांच्या भावना आजही तेवढ्याच तीव्र असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्युत दाहिनींची व्यवस्था असली तरी लाकडांचा वापर करावाच लागतो. तसेच अनेक स्मशानभूमींमध्ये चिता अधिक रचण्याचीही मागणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.