मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करणार आहेत.
सलग पाचव्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून, चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ च्या पूर्वानुमानानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२४-२५ च्या तुलनेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२५-२६ मध्ये 'कृषि व संलग्न कार्ये', 'उद्योग' व 'सेवा' या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धिमध्ये अनुक्रमे ३.४ टक्के, ५.७ टक्के व ९.० टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२५-२६ मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ५१,००,५९७ कोटी अंदाजित असून वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २८,८२,६९९ कोटी अंदाजित आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या घोषणा :
- महात्मा फुलेंच्या २०० व्या जयंती निमित्त राज्यात विशेष कार्यक्रम
- अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची रुपरेखा मांडण्याचा प्रयत्न
- संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारणार
- संत गाडगेबाब ग्राम सडक योजना राबवणार
- चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधा उभारणार
- २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समता समरसता वर्ष म्हणून साजरे करणार
- बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष योजना राबवणार
- अजित पवारांचे स्मारक उभारणार
- अजित पवारांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार
- यंदाचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित
- राज्याला गतिमान करण्यासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन असे चार टप्पे निश्चित केले आहे. त्यात १६ उपक्षेत्रे निश्चित केली आहेत.
- २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा मानस
- शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार
- राज्यातील चारही कृषी विद्यापीठात एआय आणि इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करणार
- मत्स्यव्यवसाय प्रतिवर्षी १ हजार ४०० कोटी भाराच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता देण्यात येत आहे
- मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मान्यता
- इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार
- ५० लाख रोजगार निर्मितीसाठी सेवा आणि उद्योग क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा
- मुंबई, सिंगापूर आणि दुबईत पर्यटन कक्ष सुरू करणार
- सह्याद्री खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ रोप-वे उभारणार