मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय झाली असला तरी, त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. उलट, राज्याच्या तापमानात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत असून मार्च हीटचा चटका आता अधिक तीव्र होऊ लागला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत जाणवणार असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील तापमानाची सद्यस्थिती
महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आता कमाल तापमानाचा पारा 37 डिग्रीच्या आसपास पोहोचला आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. जळगाव, धुळे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये सूर्याचा प्रखर ताप जाणवत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर देखील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असून घामामुळे नागरिक हैराण होत आहेत.
सध्याच्या हवामानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान यातील प्रचंड तफावत. दिवसा पारा ३५ अंशांच्या वर जात असताना रात्री आणि पहाटे मात्र हवामानात गारवा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमान १६ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सुमारे १५ ते १७ अंशांचा फरक असल्याने सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कोकण विभागात मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात समुद्री वारे उशिरा येत असल्यामुळे दिवसा उष्णता जास्त राहील. किनारपट्टीच्या भागात उकाडा वाढल्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवेल. तापमान ३७ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमध्ये दक्षिण-पूर्व वाऱ्यांमुळे उष्णता अधिक राहील. दिवसा घराबाहेर पडताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतील.
विदर्भ मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ आणि मराठवाड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पारा ३७°C पार जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यादेवीनगरमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे आणि गरम राहील.दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागातही तापमानाचा कल वाढता आहे. येथे पावसाची कोणतीही शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली नाही.
पावसाची शक्यता कुठे?
महाराष्ट्रात संपूर्ण आठवडाभर कोरड्या हवामानाचा अंदाज असला तरी, दक्षिण भारतात केरळच्या काही भागात तिरुवनंतपुरम आणि कोल्लम हलक्या स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र ४ ते ८ मार्च दरम्यान कुठेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. महाराष्ट्रात आता उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. कोरड्या हवामानामुळे पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळलेले बरे. पुढील ४८ तासांत तापमानात आणखी १ ते २ अंशांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे.