मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याबाबत आरोग्य विभागाला तातडीने सूचना दिल्या जातील, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. तसेच, बंद दरवाजाच्या लोकल वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार काशिनाथ दाते यांनी मुंबईतील रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येकडे लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेबाबत माहिती देताना सरनाईक यांनी २०१४ आणि २०२५ च्या आकडेवारीची तुलना केली. ते म्हणाले. "२०१४ मध्ये रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ३ हजार ४२३ इतकी होती, जी २०२५ मध्ये १ हजार १३६ पर्यंत खाली आली आहे. तसेच जखमींची संख्याही ३ हजार २९९ वरून १ हजार ४५ पर्यंत कमी झाली आहे," असे त्यांनी नमूद केले. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच हे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांसाठी आरक्षित डब्याचा प्रश्न रेल्वेच्या अखत्यारीत
लक्षवेधी दरम्यान आमदार काशिनाथ दाते आणि ज्योती गायकवाड यांनी रेल्वेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आरक्षित डबा ठेवण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना, असा निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार रेल्वेसोबत समन्वय साधून अनेक उपाययोजना राबवित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर मेट्रोचे जाळे वाढविण्याबरोबरच स्थानिक प्रशासनाच्या लोकल बसेस मुंबई शहरात जास्तीत जास्त सुरु करण्यातही भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.