महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारठा होता, तिथे आता उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विदर्भातील अकोला शहरात देशातील सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, राज्याचा पारा वेगाने वर सरकत आहे. दुपारी उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, नागरिकांना उन्हाळ्याच्या तीव्रतेची जाणीव मार्चच्या सुरुवातीलाच होऊ लागली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबतच आर्द्रता (Humidity) वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही भागांत उष्ण आणि दमट हवेचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. संकुलातील साबरमती ...
दोन दिवसांत पारा ३५ च्या पुढे
पुणे आणि आसपासच्या परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्यात सलग दोन दिवस कमाल तापमानाने ३५ अंश सेल्सिअसची ओलांडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आता पूर्णपणे ओसरला असून, उन्हाची तीव्रता आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा केवळ डिसेंबर महिन्यातच कडाक्याची थंडी जाणवली होती, तर नोव्हेंबरपर्यंत पावसाने मुक्काम ठोकला होता. देशातील काही राज्यांत अजूनही पावसाचे थैमान सुरू असले, तरी महाराष्ट्रात मात्र आता उन्हाळा आपला प्रभाव दाखवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यातच तापमानाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होण्याची भीती आहे. यंदा हवामानातील या सततच्या बदलांमुळे (Weather Fluctuations) शेतीवर आणि जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही!
देशाच्या हवामानात सध्या कमालीची विसंगती पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे देशातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तिथे अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. याच्या अगदी उलट चित्र महाराष्ट्रात असून, अकोल्यात देशातील सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. एकाच वेळी देशाच्या दोन भागांत तापमानाचा हा मोठा फरक हवामान बदलाचे संकेत देत आहे. महाराष्ट्रातही तापमानाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळत आहेत. राज्याचा विचार करता, धुळे येथे निचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पारा ३५ अंशांच्या पुढे सरकला असून उन्हाळ्याची चाहूल तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, आज राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, यामुळे आर्द्रता वाढून उकाड्यात अधिकच भर पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. या भागात हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.